*बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांनी केली मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या तब्येतीची विचारपूस* *राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांकडूनही यापूर्वीच झाली आहे विचारपूस*
पंढरपूर / प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांनी सोमवारी पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांनी धोत्रे यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेत त्यांना धीर देत काळजी घेण्याचा सल्ला दिला.
काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर दिलीप धोत्रे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर झाली. या प्रसंगानंतर “साक्षात पांडुरंगाच्या कृपेने आपण वाचलो,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली होती.
अपघातानंतर राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
त्याच अनुषंगाने राजेंद्र पवार यांनीही पंढरपूर दौऱ्यादरम्यान धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची भेट घेतली.
यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर तसेच डॉ. योगेश रणदिवे हे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळख असलेले दिलीप धोत्रे हे पंढरपूरसह राज्यभर परिचित आहेत. “एक नेता, एक झेंडा, एक पक्ष” या भूमिकेतून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण आणि उद्योग क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान राहिले आहे.
दरम्यान, या भेटीदरम्यान राजेंद्र पवार यांनी धोत्रे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. अपघातानंतरच्या परिस्थितीची माहिती घेत त्यांना मानसिक आधार दिला. यावेळी भावना व्यक्त करत दिलीप धोत्रे म्हणाले, “या कठीण काळात आपुलकीने विचारपूस करणारी माणसं मिळणं हेच खरं बळ असतं.” राजेंद्र पवार यांच्या या सदिच्छा भेटीमुळे धोत्रे कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले.